बीड स्पीड न्यूज
राज्यकर्त्यांनी राज्यकारभार कसा करावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - धनंजय मुंडे
महामानावांना जाती-पातीत बंधू नका, इतिहास आपली वाईट नोंद घेईल - धनंजय मुंडेंचे आवाहन
परळी तालुक्यातील सिरसाळा येथे धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
सिरसाळ्यात ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभारणार - मुंडेंची घोषणा
सिरसाळा ता. परळी (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म आणि नीतीने राज्य केले, परळी वैद्यनाथसह अनेक मंदिरांचा व धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. राज्यकर्त्यांनी राज्यकारभार कसा करावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सिरसाळा येथे बोलताना
व्यक्त केले आहे. सिरसाळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी मान्यवरांसह अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. महामानव-महापुरुषांच्या कार्याने सामाजिक क्रांती घडली, त्यांचे विचार महान व युगप्रवर्तक आहेत. त्यांना जाती-पाती पूरते मर्यादित ठेवू नका, असे आवाहन यानिमीत्ताने धनंजय मुंडे यांनी
उपस्थितांना केले. विरोधीपक्ष नेतेपदी असताना धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढाईत मी विधिमंडळात वेळोवेळी भूमिका मांडली, आजही मी त्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी शेळी मेंढी पालन महामंडळाला राज्य सरकारने भरीव निधी द्यावा, यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सिरसाळा हे तालुक्यातील मोठे व प्रगतशील गाव असून, एम आय डी सी व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या बाजार उपपेठेच्या माध्यमातून इथे व्यापार व रोजगाराच्या मोठ्या
संधी उपलब्ध होणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. या गावातील ग्रामपंचायतीसाठी आगामी काळात अत्यंत देखणी इमारत उभी करणार असल्याचा मानस धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगराव काळे, प्रभाकर नाना वाघमोडे, युवा नेते अजयजी मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, बाळासाहेब दोडतले, परळी पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी, संजय गांधी समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, बंडू खांडेकर, व्यंकटेश चामनर, विकास बिडगर, अविनाश धायगुडे, शिवदास बिडगर, बाळासाहेब किरवले, प्रभाकर पौळ, राम किरवले, इम्रान पठाण, वसंर राठोड, संतोष पांडे, नदीम शेख, चंद्रकांत कराड, संजय जाधव, मनोहर केदार, प्रकाश कावळे, विश्वनाथ देवकते, सुरेश कराड, विजय धायगुडे, रुस्तुमराव सलगर, माऊली घोडके, देवराज काळे, कार्यक्रमाचे आयोजक ऍड. सतीश काळे, गोरख काळे, व्यंकटेश काळे, शरद काळे, कल्याण काळे यांसह आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या