भाजपा आमदार राम कदम यांनीही दहीहंडी उत्सवाच्या संदर्भातल्या निर्णयावरुन ठाकरे सरकारला सुनावले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, बार, दारुचे ठेके उघडताना कोरोनाची तिसरी लाट आडवी येत नाही. मॉल उघडताना, बाकीच्या गोष्टी उघडताना बंद करताना तिसरी लाट आडवी येत नाही. हिंदुंची मंदिरं..तीही नियमांसहीत उघडताना तिसरी लाट आडवी कशी येते? दारुची दुकाने कोरोनाप्रूफ आहेत की वेगळे चिलखत घालून बसली आहेत?मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासहीत राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. तसेच सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असे या बैठकीमध्ये समन्वय समितीने सरकारला सांगितले.दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो असे टास्क फोर्सने सांगितले असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे . हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली. मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना समजावून सांगितले.
0 टिप्पण्या