Subscribe Us

header ads

त्या चार मुलांच्या मृत्यूप्रकरणातील एका वाळूमाफियाला अटक

बीड स्पीड न्यूज 


त्या चार मुलांच्या मृत्यूप्रकरणातील एका वाळूमाफियाला   अटक

गेवराई_ वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे मागील आठवड्यात रविवारी रात्री उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी चार दिवसांनंतर चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणातील चारही आरोपी फरार झाले होते. दरम्यान यापैकी एका वाळू माफियाला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्याला पाचोड येथून अटक करण्यात आली आहे. हि कारवाई गेवराईचे सपोनि संदीप काळे यांच्या पथकाने शनिवारी रात्री केली असल्याची माहिती आहे.गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला हे सिंदफना काठावरील गाव आहे. या ठिकाणी वाळू माफियांनी मोठ्या नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे केले आहे. त्यामध्ये पाणी साचलेले आहे. याच पाण्यात बुडून शहाजानपूर येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे, आणि अमोल संजय कोळेकर, या नऊ ते बारा वर्षे वयाच्या बालकांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 6 फेब्रुवारी रोजी घडली होती. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक होऊन जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन बीड- गेवराई महसूल व पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.
तसेच या प्रकरणाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी चौकशी समिती नेमली असून या समितीने घटनास्थळाची पाहणी करून हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. तर याप्रकरणी घटनेच्या चार दिवसानंतर या प्रकरणीत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ व आर्जुन कोळेकर (सर्व रा. तांदळवाडी ता. जि. बीड) यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा तपास सपोनि संदीप काळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.दरम्यान गुन्हा दाखल होण्याची चाहुल लागताच वरील चारही आरोपी फरार झाले होते. या फरार आरोपीपैकी संदीप हनुमान निर्मळ (वय 28) हा पाचोड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि संदीप काळे यांनी सापळा रचून आरोपी संदीप निर्मळ याला अटक केली असल्याची माहिती आहे. तर उर्वरीत तीन आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा