बीड स्पीड न्यूज
सर्व अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संयम सोडू नये - धनंजय मुंडे
गेवराई तालुक्यातील घटना दुर्दैवी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने गेवराईत पाठवले
मुंबई (दि. 11) -: केवळ बीड, परभणी नव्हे ते यावर्षी सबंध महाराष्ट्रात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांच्या अतिरिक्त ऊसाचे गाळप होईपर्यंत बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने साखर कारखान्यांना दिलेले आहेत. अतिरिक्त उसाच्या प्रश्नामुळे परिस्थिती गंभीर असली तरी राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन करतानाच अगदी जून महिन्यापर्यंत, पाऊस पडे पर्यंत कारखाने ऊसाचे गाळप करतील अशी माहिती बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील ऊस अगदी कर्नाटक - आंध्र प्रदेश सीमेपर्यंत गाळप करण्यासाठी जात आहे, बीड जिल्हा प्रशासन व साखर आयुक्त यांच्यासमवेत वारंवार बैठका घेऊन ऊस तोडणी साठी हारवेस्टर व अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. कोणाचाही ऊस गाळप केल्यावाचून शिल्लक राहू नये, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस गाळप बंद करू नये, तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक नसला तरी कारखाने बंद न करता इकडचा ऊस गाळप करावा, संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा विचार करून कारखाने बंद करू नयेत, अशा सूचना बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखान्यांना श्री. मुंडे यांनी केल्या आहेत.बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव नामक शेतकऱ्याने आज आत्महत्या केल्याची घटना समजली असून, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिक माहिती घेत आहे, जिल्हाधिकारी यांना मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन अधिक माहिती घेण्यास व संबंधित घटनेप्रकरणी शासनाच्या मदत व अन्य कार्यवाही तातडीने करण्यासंबंधी सूचना केल्या असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान सन 2021-22 मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने व लागवडीचे प्रमाण वाढल्याने बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ऊसाचे पीक अतिरिक्त आहे, बीड जिल्ह्यात तर नेहमीच्या तुलनेत सुमारे पावणेतीन पट ऊस असून, यातील बराच ऊस आणखी गाळपाच्या प्रतीक्षेत आहे; या संपूर्ण ऊसाच्या गाळपाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली असून, शेतकऱ्यांनी संयम बाळगण्याची आवश्यकता असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. मे महिन्याच्या 2 तारखेला बीड जिल्हा प्रशासनासमवेत धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन हारवेस्टर ची मागणी व अन्य बाबी साखर आयुक्तांना कळवल्या होत्या, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पट्टा पडलेल्या कारखान्यातील हारवेस्टर मराठवाड्यात पाठवून इकडचा अतिरिक्त ऊस गाळप करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू केले होते. ऊस तोडणीसाठी यंत्रणा उपलब्ध करून संपूर्ण उसाचे गाळप केले जाईल, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले असून, शेतकऱ्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या