बीड (प्रतिनिधी):- शिवणी लघु सिंचन प्रकल्पाच्या सांडव्यावरून अनेकवेळा पाणी ओव्हरफ्लो होते, हे ओव्हरफ्लो होणारे पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून जरूड लघु सिंचन प्रकल्पात वळवले गेले तर निश्चितच ओव्हरफ्लो होणारे पाणी वाया न जाता शेतकर्यांना उपलब्ध होईल. यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शासनस्तरावर दाखल केलेल्या प्रस्तावात तांत्रिक अडचणीमुळे या कामास अंतिम मंजुरी मिळण्यास अडचणी येत होत्या. यातील आता तांत्रिक अडचणी दुर झाल्याने सदर प्रश्न मार्गी लागल्याचा प्रश्न सुखर झाला आहे. शिवणीच्या तलावातून ओव्हरफ्लो होणारे पाणी जरूडच्या तलावात सोडल्याने याचा अनेक गावातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.
बीड तालुक्यातील शिवणी लघु सिंचन प्रकल्पाच्या सांडव्यावरून ओव्हरफ्लो होणारे पाणी जरूडच्या साठवण तलावात सोडण्यात यावे यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रादी काँग्रेसचेे नेते माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या कामाला शासनस्तरावर मान्यता मिळाली होती. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे या कामास अंतिम मंजुरी मिळाली नाही. अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. आ.संदिप क्षीरसागर यांनी जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजीनाथ चिल्ले यांची मुंबई येथे भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा करून या कामातील त्रुटी दुर करून या कामास अंतिम मान्यता द्यावी अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत चिल्ले यांनी सदर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाला लवकरच सादर केला अशी ग्वाही दिली. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, जलसंपदा विभागाच्या अभियंता पाटील मॅडम यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.
*अनेक गावच्या शेतकर्यांना होणार लाभ*
शिवणी लघुसिंचन प्रकल्पाच्या सांडव्यावरून जे पाणी ओव्हरफ्लो होवून वाया जाते ते ओव्हरफ्लो होणारे पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून जरूडच्या लघुसिंचन प्रकल्पात सोडण्यात यावे यासाठी माजी आ.अमरसिंह पंडित यांचाही अनेक दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्याशी समन्वय साधून गेल्या दोन वर्षापासून आ.संदिप भैय्या क्षीरसागर सातत्याने या प्रस्तावाच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्य अभियंता जलसंपदा व स्थानिक अधिकार्यांशी संपर्क ठेवून पाठपुरावा करत आहेत. या सदर प्रस्तावाच्या अंतिम मंजुरीमुळे शिवणी व जरूड परिसरातील अनेक गावच्या शेतकर्यांना लाभ होणार आहे. या कामामुळे शिवणी येथील साठवण तलावातील पाणी साठ्यास तसेच स्थानिक शेतकर्यांना कोणतेही नुकसान होणार नाही.
0 टिप्पण्या