प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
बीड प्रतिनिधी/ दि.१३ गेल्या आठवड्यामध्ये अचानकपणे आलेल्या पावसाने बीडसह मराठवाड्यात थैमान घातले आहे, अनेक छोटे बंधारे पावसाच्या पाण्यामुळे फुटले आहेत व त्यामुळे त्या खाली असलेल्या शेतीचे नुकसान झाले आहे, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस ही पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अतिवृष्टी झालेल्या भागांना बीडचे जिल्हाधिकारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन भेट देऊन फोटो काढत आहेत. परंतु शेतकऱ्याचे झालेले नुकसान हे भरून निघणार आहे का? नुसते फोटो काढण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधावर जाऊन आर्थिक मदत करावी जेणेकरून कर्ज काढून शेती पिकवलेल्या शेतकऱ्याला यावेळी आधार मिळेल व तात्काळ पिक विमा देखील वाटप करावा अशी मागणी समाजसेविका सुरेखा जाधव यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. जर शेतकऱ्यांना बांधावरच आर्थिक मदत मिळाली तर शेतीसाठी घेतलेले कर्ज व कर्जबाजारी शेतकरी हा आत्महत्या करणार नाही.तात्काळ आर्थिक मदत न झाल्यास शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल आणि याला सर्वस्वी या ठिकाणचा शासन जबाबदार असेल असे पत्रकात म्हटले आहे. म्हणून तात्काळ जिल्ह्यातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांची हात बळकट करावे अशी मागणी सुरेखा जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या