बीड स्पीड न्यूज
नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच घातले साकडे !
बीड (प्रतिनिधी) - शहराच्या शिक्षण क्षेत्रात अग्रभागी असलेल्या शाळा व महाविद्यालयाच्या मार्गावर असलेली तसेच घाण व दुर्गंधी पसरविणाऱ्या कचरा कुंडीला हटवण्याची मागणी नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केल्याने बीड नगर परिषद स्वच्छतेबाबत करत असलेल्या दाव्याचे वाभाडे निघाले आहे.याविषयी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अजीजपुरा ते बलभीम महाविद्यालय, मिल्लीया महाविद्यालय कडे जाणारा रस्ता व कागदी वेस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध त्रिकोणाकृती चौकात एक कचरा कुंडी आहे. कचरा कुंडी पासून निवेदनकर्त्यांचे घर फक्त १० ते १२ फुटाच्या अंतरावर आहे. पाऊस व नळाला पाणी आल्यावर कुंडीबाहेरचा कचरा व घाण नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. यामुळे गलिच्छतेने रोगांना निमंत्रण मिळत आहे. माळीगल्ली, अजीजपुरा, कागदीवेस तसंच कारंजा परिसरातील लोक येथे येवून कचरा टाकतात. यामुळे कचरा कुंडी एकाच दिवसात पूर्ण भरुन रस्त्यावर कचरा व घाण पसरते आणि जवळपास च्या घरात शिरते. कचरा कुंडीच्या १५ फुटावर एक प्राथमिक इंग्रजी शाळा तसेच अंगणवाडी सुद्धा आहे. कचरा कुंडीपासून २० फुटावर मस्जिद आहे. खासबाग देवी मंदिराला जाणारे भाविक ही याच रस्त्याने ये-जा करतात. कचरा कुंडीतील घाण व कचऱ्यामुळे विद्यार्थी, शिक्षकगण, भाविकांसह सर्व जनतेला व याभागातील रहिवाशांना या कचराकुंडी मुळे फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले तसेच कचरा कुंडीच्या आजुबाजूला असलेल्या घरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. शिवाय ज्या ठिकाणी ही कचराकुंडी ठेवण्यात आलेली आहे ते चढाचं ठिकाण आहे. यामुळे येथे दुचाकी पासून तीन व चार चाकी अशा सर्व वाहनांना जास्तीचा वेग देऊन वाहने चालवावी लागतात. तरचं मिल्लिया शाळा व महाविद्यालय आणि बलभीम महाविद्यालय कडे वाहन बंद न पडता जाते. रस्त्यावर पडलेल्या अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे वाहनांना वेग देता येत नसल्याने येथे दिवसातून शंभर वाहने बंद पडतात. येथील कचराकुंडीत टाकलेला कचरा कुंडी बाहेरही ओसंडून वाहत असल्याने येथून ये-जा करताना सर्व प्रकारच्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत कसेतरी ये-जा करावी लागते. या सर्व बाबीकडे लक्ष देऊन जिल्हाधिकारी साहेबांनी जागेचे सर्वेक्षण करावे. तसेच स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नगर पालिके मार्फत परिसरासाठी दररोज घंटा गाडी पाठवून येथील कचरा कुंडी कायमची हटविण्यात यावी. अशी कळकळीची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मुहम्मद अस्लम अन्वरी, शेख अश्फ़ाक़, पठाण असलम, पठाण अब्रार, शेख जलील, शेख जमील, शेख एकबाल, पठाण वहाब, पठाण अरबाज, मुमताज इनामदार, जहीर टेलर, डॉ. अहेबार अली, अदनान खान, डॉ. शफी अन्वरी, शेख वसीम, सय्यद खुद्दुस, शेख कलीम, सिद्दीकी अहेमद, वहाब काज़ी, शेख अहेमद, शेख इब्राहिम, मोमीन ख़वी, झहीर खान, शाहरुख खान, शेख अमन आदींनी केली आहे.
0 टिप्पण्या