रस्त्याच्या दुरावस्थेचा बळी, रस्त्यासाठी पालकमंत्र्यांकडे साकडे
गेवराई ( प्रतिनिधी ):- बीड जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका ४० वर्षीय महिलेला अचानकपणे छातीत दुखू लागल्याने तिला रुग्णालयात घेवून जाताना चिखलात गाडी अडकली त्यामुळे रुग्णालयात जाण्यासाठी उशीर झाला आणि सदर महिलेचा मृत्यू झाला.गेवराई तालुक्यातील चकलांबा-चोरपुरी रस्त्यावर सदर घटना घडली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे महिलेला वेळेवर उपचार मिळू शकलेला नाही चाळीस वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. आशाबाई उमाजी गंडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला पर्याय देखील उपलब्ध नव्हता
दरम्यान, सदर घडलेली घटना अशी आहे की, आशाबाई उमाजी गंडे या अपंग महिलेच्या सोमवारी दुपारी छातीत दुखू लागल्यानं त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तात्काळ रुगणालयात हलवण्याच्या हालचाली सुरु केल्या. आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन निघाली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे जागोजागी पाणी जमा झाले असून, चिखल देखील जमा झाला होता. मात्र, चालकाने यातून वाट काढायचा प्रयत्न केली तरी वाटेतच गाडी चिखलात फसली. काळी मातीचा चिखल असल्याने चिखलातून गाडी बाहेर काढणे अवघड जात होत. चालकाने अथक परिश्रम करुन देखील गाडी काही केल्या निघत नव्हती. आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. दरम्यान वेळेवर उपचार मिळू न शकल्याने आशाबाई यांचा गाडीतच दुर्दैवी मृत्यू झाला.
चारचाकी, दुचाकी सोडाच, परंतु पायी चालणे देखील या रस्त्यावरून अवघड आहे
पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बघून तर चोरपुरी येथील ग्रामस्थ दळणवळण कशाप्रकारे करतात याचा विचार देखील आपण न केलेला बरा. स्वातंत्र्याची ७५ वर्षे लोटली असताना देखील या गावाला अद्यापही रस्ता झाला नाही, हे मोठे दुर्दैव आहे. सदर गाव हे गेवराई तालुक्यातील चकलांबा पासून चार किलोमीटर अंतरावर चोरपुरी हे डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे. गावात कोणी आजारी पडले, महिलांची प्रसुती यावेळी ग्रामस्थांना देवाच्या भरोसे रहावे लागते. चारचाकी, दुचाकी सोडाच, परंतु पायी चालणे देखील ग्रामस्थांची मोठ अवघड आहे.
आश्वासनांची खैरात करणाऱ्या पुढाऱ्यांविरोधात संताप व्यक्त
विकासाच्या गप्पा मारणारे, निवडणुका जवळ आल्या की, आश्वासनांची खैरात करणाऱ्या पुढाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे. विकासाच्या गप्पा मारणारे, तसेच तात्काळ गावाला जोडणारा पक्का रस्ता तयार करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी रस्त्याचा प्रश्न सोडविला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा देखील या गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, सदर महिलेवर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या