बीड(प्रतिनिधी):-गेल्या काही दिवसात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा तर देशोधडीला लागलेला आहे. प्रशासन आणि शासनाच्या वतीने केवळ पोकळ घोषणांचे आवाज केले जात आहेत. पंचनाम्याचे फार्स सुरु झाले आहेत. परंतु बीड शहरात त्या अतिवृष्टीमुळे गोरगरीब लोकांच्या घरांची पडझड झालेली आहे.अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे बीडच्या नवनियुक्त तहसीलदारांनी डोळ्यावरचा चष्मा बाजूला सारत बीड मधील नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन गोरगरीबांना शासकिय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन शिवसेनेचे उपशहर प्रमुख कामरान शेख यांनी केले आहे.अन्यथा शिवसेना स्टाईलने तहसीलदारांना समजून सांगता येईल असाही इशारा शेख यांनी दिला आहे.पाऊस हा नेहमीच टिकेचा धनी ठरलेला आहे. कमी पडला तरी टिका आणि जास्त पडला तरीही टिकाच. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अक्षरश: आभाळ फाटलं आहे. ठिकठिकाणी नद्यांना महापुर आला आहे. शेतकर्यांची पीके तर सोडाच परंतु जमिनी सुध्दा वाहून गेल्या आहेत. ग्रामीण भागातील जनता हवालदिल झालेली असताना बीड शहरात सुध्दा यापेक्षा वेगळी परिस्थिती म्हणता येणार नाही. बीड शहरातील अनेक जुन्या वस्त्यांत राहणार्या नागरिकांच्या घरांची पडझड झालेली आहे. अनेकांच्या भिंती ढासळल्यामुळे त्यांना त्यांचे संसार रस्त्यावर आणावे लागले आहेत. अशा प्रसंगी बीडचे तहसीलदार जे नव्याने आल्या आहेत त्यांच्यासमोर तर अनेक प्रशासकिय प्रश्न आहेतच. परंतु त्यांनी शासनाकडून होणार्या नुकसानाच्या पंचनाम्यामध्ये बीड शहरातील नागरिकांच्या नुकसानीचाही समावेश करावा त्यांना प्रशासकिय पातळीवरुन मदतीसाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन त्या गोरगरीब जनतेचे संसार पुन्हा उभे राहतील. एकास एक न्याय तर दुसर्यास दुसराच असे काहीही करुन चालणार नाही असे म्हणत शिवसेनेचे उपशहरप्रमुख कामरान शेख यांनी म्हटले आहे की, जर प्रशासनाच्या वतीने असे काही करण्याचा प्रकार झाला तर तहसीलदार साहेब लक्षात ठेवा शिवसेनास्टाईलने तुम्हाला उत्तर मिळेल. गोरगरीबांप्रती आमच्या असलेल्या संवेदना समजून घ्या अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेख कामरान यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या