आष्टी - पिकअपचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रूपये घेऊन ये म्हणून पतीसह सासरच्या लोकांनी विवाहीतेकडे तगादा लावला. माहेरहून ५० हजार रुपये देऊनही उर्वरित रकमेसाठी तिचा सतत छळ केला. जात होता.अखेर या छळाला कंटाळून त्या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.काजल अमोल सांगळे (वय २०, क-हेवाडी, ता. आष्टी) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. काजलचे वडील मच्छिंद्र नवनाथ आंधळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन वर्षापुर्वी काजलचा विवाह क-हेवाडी येथील अमोल महादेव सांगळे याच्याशी झाला होता. सुरुवातीचे ३-३ महिने व्यवस्थित गेल्यानंतर तिचा सासरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून छळ केला जात होता. पिकअप साठी घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून मागील सहा महिन्यापासून पती अमोल सांगळे, सासरा महादेव सांगळे, सासू मकाबाई सांगळे, नणंद सुवर्णा गोल्हार, अलका गोल्हार, नंदावा दादासाहेब गोल्हार, व गहिनाथ गोल्हार, यांनी काजलला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती झाल्यानंतर काजलच्या वडिलांनी तिच्या सासरी ५० हजार रुपये दिले. त्यानंतरही उर्वरित रकमेसाठी तिचा छळ सुरूच राहिला, अखेर सततच्या छळास कंटाळून काजलने सोमवारी (दि.०४) विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सदर फिर्यादीवरून काजलच्या पतीसह सात जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस हे करीत आहेत.दरम्यान, काजलचा मृतदेह क-हेवाडी येथील सांगळे यांच्या शेतात मंगळवारी सकाळीच सापडला होता. परंतु माहेरच्या लोकांनी घातपाताचा संशय घेतल्याने तिचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रूग्णालयात शवविच्छेदनादासाठी पाठविण्यात आला. बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर आष्टी येथील अमरधाममध्ये पोलिस बंदोबस्तात काजलच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.
0 टिप्पण्या