बीड स्पीड न्यूज
बीड (प्रतिनिधी) - शहरातील बीड नगर परिषद पासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या आसेफनगर चा मुख्य रस्ता व नाला आता चेष्टेचा विषय झाला असून या रस्त्याचे व नाल्याचे चौथ्यांदा भूमिपूजन करण्यात आल्याने आता दस्तुरखुद्द आसेफनगरवासी याविषयी एक दुसऱ्याला बोलताना मोठ्या प्रमाणात चेष्टा करू लागले आहे. पण शेवटी हा रस्ता व नाला नक्की कधी बनविण्यात येईल हा विचार करून अंतर्मुख ही होत आहेत. असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शिवाजीनगर पोलीस ठाणे कॉर्नर पासून ते दीप हॉस्पिटल मार्गे थोरातवाडी कॉर्नर पर्यंत आसेफनगर चा मुख्य रस्ता साधारण ३५ वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर काही काळाने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याला डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण कसे असते हे माहीत नाही. शिवाय चांगला रुंद व खोल आणि मजबूत बनविलेला नाला कसा असतो हे ही येथील नाल्याला माहित नाही. ही दुरावस्था साधारणतः गेल्या ३० वर्षापासून आहे तशीच आहे. मात्र या ३० वर्षांच्या कालावधी मध्ये काही वर्षांपूर्वी याच रस्त्याचे व नाल्याचे बीड नगर परिषद मध्ये दीर्घकालीन नगराध्यक्ष राहिलेले डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सर्वप्रथम भूमिपूजन केले होते. त्यानंतर काही वर्षांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेले हेमंत क्षीरसागर यांनी भूमिपूजन केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी स्वीकृत सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भूमिपूजन केले होते. या तिन्ही क्षीरसागरांच्या हस्ते प्रत्येकी एकदा येथील रस्ता व नाल्याचे भूमिपूजन झाले आहे. परंतु एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये अजूनही येथील रस्ता व नाल्याचे काम काही मार्गी लागले नाही. त्यातच आता विद्यमान आ. संदीप क्षीरसागर यांनी घाई गडबडीत माजी आमदार सय्यद सलीम यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा या रस्त्याचे व नाल्याचे आज भूमिपूजन उरकले आणि एकाच रस्त्याचे व नाल्याचे भूमिपूजन करण्याचा चौकोन या चारही क्षीरसागरांमुळे काम न करता आज पूर्ण झाला. शिवाय आज दिनांक २० सप्टेंबर २०२२ असून येथे लावलेल्या भूमिपूजन फलकावर मात्र १९ सप्टेंबर २०२२ अशी दिनांक नमूद आहे. म्हणजे आतापर्यंत जसे कामासंदर्भात फक्त भूमिपूजन च्या पुढे काही झाले नाही तसे भूमिपूजन फलकात सुद्धा तारखे मध्ये बनवाबनवी करण्यात आली, की यामागेही काही गुढ व घोळ आहे ? याबद्दल आसेफनगरवासीय एक दुसऱ्याशी चर्चा करताना मोठ्या प्रमाणात चेष्टात्मक गप्पा मारीत आहेत. म्हणून आता आसेफनगरचा मुख्य रस्ता व नाला चेष्टेचा विषय झाला असून राजकारणात असलेल्या पाच क्षीरसागरांपैकी या रस्त्याचे भूमिपूजन करायचे फक्त आता जयदत्त अण्णा क्षीरसागरच उरले असल्याचेही येथील नागरिक मोठ्या खुमासदारपणे एक दुसऱ्याला म्हणत आहेत. पण शेवटी हा रस्ता व नाला नक्की कधी बनविण्यात येईल हा विचार करून अंतर्मुख ही होत आहेत. असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या